टीईटीचा निकाल जाहीर; गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक निकाल


शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला असून, यामध्ये १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल असला, तरी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे १९ जानेवारी रोजी पेपर १ (इयत्ता पहिली ते पाचवी गट), तर पेपर २ (इयत्ता सहावी ते आठवी गट) अशा पद्धतीने टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.mahatet.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. पेपर १ हा एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी दिला. त्यापैकी १० हजार ४८७ उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन हा एक लाख ५४ हजार ५९६ उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार १०५ उमेदवार पात्र झाले. दोन्ही पेपर मिळून १६ हजार ५९२ उमेदवार पात्र झाले.

या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास नसल्यास येत्या १५ ऑगस्टपर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

गेल्या पाच परीक्षांमधील पात्र उमेदवारांची संख्या

वर्ष-पेपर १- पेपर २- एकूण

२०१४-२५६३-७०३२-९५९५

२०१५ - १९०३-७०८६-८९८९

२०१७- ७४४५- २९२८-१०३७३

२०१८ - ४०३०-५६४७-९६७७

२०१९-१०४८७-६१०५-१६५९२

(२०१६ परीक्षा झाली नाही)