पदवी परीक्षा ऑक्टोबरमध्ये; प्रॅक्टिकल परीक्षा १५ सप्टेंबरपासून

Final Year Exams 2020

 


Final Year Exams 2020 : पदवी परीक्षांबाबतचा कुलगुरू समितीचा अहवाल शुक्रवारी दुपारी १२ वाजता जाहीर केला जाणार आहे

Final Year Exams 2020: पदवी परीक्षा कधी होणार यावर गुरुवारी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अधिक स्पष्टपणे भाष्य केले. पदवी परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लावायचे आहेत. त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर घेण्याचा प्रयत्न असणार आहे. लेखी परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, त्यांच्या तारखा विद्यापीठे त्यांच्या स्तरावर जाहीर करतील, असे सामंत यांनी गुरुवारी सांगितले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता कुलगुरू समितीच्या अहवालाच्या शिफारशी जाहीर केल्या जाणार आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उदय सामंत आणि कुलगुरू समिती सदस्यांची बैठक झाली.

या बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘परीक्षा सोप्या पद्धतीने व्हाव्यात यासाठी राज्यपालही अनुकूल आहेत. शिवाय विद्यार्थ्यांनी घरी बसून परीक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी दिली आहे.’

पदवीच्या अंतिम वर्षाच्या ज्या विद्यार्थ्यांना एटीकेटी लागलेली आहे, त्यांच्या एटीकेटी परीक्षाही पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांप्रमाणेच घेण्यात येतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. ‘ज्याअर्थी प्रात्यक्षिक परीक्षा १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत घेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत लावायचे आहेत, त्याअर्थी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून पदवी परीक्षांना सुरूवात होईल हे स्पष्ट आहे. विविध विद्यापीठे त्यांच्या स्तरावर तारखा पुढे-मागे ठरवतील,’ असे सामंत म्हणाले.

अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची आज राजभवन येथे ऑनलाईनच्या माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, परीक्षेसंदर्भात गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनानुसार दि. १५ सप्टेंबर पासून सुरू करून दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत निकालासह परीक्षा प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषद आणि विद्यापीठाच्या परीक्षा मंडळा समोर ठेऊन दोन दिवसात शासनास कळवावे आणि राज्य आपत्कालीन प्राधिकरणाची बैठक मंगळवारी घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी अशी सूचना राज्यपालांनी केली. परीक्षा पद्धती संदर्भात विद्यापीठांनी व्यवस्थापन परिषद आणि परीक्षा मंडळामध्ये परीक्षेसंदर्भात गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर करून परीक्षा पद्धती निवडावी, असेही राज्यपाल महोदय यांनी सांगितले.

सामंत म्हणाले, राज्यपाल महोदय यांच्या अध्यक्षेतेखाली आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोविड-१९ ची सद्याची परिस्थिती आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू करण्या संदर्भातील तयारी पूर्ण करावी. या बरोबरच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया वेळेत पूर्ण करुन अपवादात्मक परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला तर अशा विद्यार्थांच्या परीक्षेचे सुद्धा नियोजन करण्यात यावे, या संदर्भात चर्चा करण्यात आली.